Political News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीत जागावाटप आणि उमेदवारीवरून हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे.
महायुतीच्या वाट्याला आलेल्या नऊ जागांपैकी दोन जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दोन जागांसाठी अनेक इच्छुक रिंगणात असल्याने पक्षात स्पर्धा आणि नाराजी वाढत आहे.
शिंदे गटाकडून आठ जणांची नावे चर्चेत आहेत. यात नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दीपक सावंत यांचा समावेश आहे.
यापैकी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. गोऱ्हे या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती पदावर कार्यरत आहेत, तर बच्चू कडू यांनी अलीकडेच शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे मानले जाते.
मात्र, या दोन्ही नावांवरून पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषतः बच्चू कडू यांच्या बाबतीत विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा आणि सरकारवर केलेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेही काही नेते अस्वस्थ असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर पक्षातील समन्वय राखत योग्य उमेदवारांची निवड करणे हे शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. आगामी निवडणुकीत पक्षाची एकजूट टिकवून ठेवत महायुतीचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शिंदे कोणती रणनीती आखतात आणि अंतिम उमेदवारी कुणाला देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


