Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. मात्र, या दिमाखदार सोहळ्याला चोरीच्या घटनेचे गालबोट लागले आहे. लग्नातील गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी तत्परता दाखवत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अशी झाली कारवाई
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. चोरी केलेले सोने वाटून घेण्यासाठी दोन आरोपी ममदापूर फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सागर सुरेश कांबळे आणि बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (दोघेही रा. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा ‘गेम’
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी आपल्या इतर दोन साथीदारांच्या (आतिक शेख आणि सनी विलास) मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन, एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
व्हीआयपी उपस्थिती अन् शाही थाट
हा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या शाही लग्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासह अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. भव्य मंडप, आकर्षक सजावट आणि हजारो लोकांची उपस्थिती यामुळे या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला. सध्या संगमनेर पोलीस फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे लग्नसराईतील गर्दीत दागिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


