Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रलंबित वादावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनावणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, सरन्यायाधीशांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले. “तुमचे नेते न्यायालयाच्या कामकाजावर जी विधाने करत आहेत, ती अत्यंत अशोभनीय आहेत,” अशा शब्दांत कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी होणार आहे.
नेमका पेच कुठे रंगला?
ठाकरे गटाचे वकील ॲड. देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, “आम्ही गेल्या 3 वर्षांपासून या निकालाची प्रतीक्षा करत आहोत, त्यामुळे ही सुनावणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी.” यावर खंडपीठाने आक्रमक पवित्रा घेतला. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, सुनावणीच्या तारखा ठरणारच आहेत, मात्र विलंबाचे खापर न्यायालयावर फोडणे चुकीचे आहे.
सरन्यायाधीशांचे ‘खडे बोल’:
‘आम्ही रोज दुपारी 4 वाजेपर्यंत बसून काम करतो. जर कोणाला वाटत असेल की आम्ही रिकामे बसलो आहोत, तर ते चुकीचे आहे. न्यायालयाच्या प्रतिमेला तडा जाईल अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,’ असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. ठाकरे गटाच्या राजकीय नेत्यांनी न्यायालयावर केलेल्या टिप्पणीचा संदर्भ देत कोर्टाने वकिलांना आपल्या नेत्यांना आवर घालण्याची तंबी दिली.
शिंदे गटाचा आक्षेप आणि कोर्टाचा निर्णय
शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेचा निषेध केला. “न्यायालयावर कामाचा प्रचंड भार आहे याची सर्वांना कल्पना असावी, विनाकारण आरोप करणे चुकीचे आहे,” असे रोहतगी यांनी नमूद केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने ही सुनावणी आता न्यायालयाच्या सुट्टीनंतर म्हणजेच 30 जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.


