Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल 80 लाख महिला योजनेतून अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 46 लाखांवरून थेट 1 कोटी 66 लाखांवर आली आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योजना बंद होणार नसली तरी सध्या नव्याने अर्ज स्वीकारण्याचा किंवा नोंदणी पुन्हा सुरू करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. तसेच ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याचाही कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
30 एप्रिल रोजी ई-केवायसीची अंतिम मुदत संपल्यानंतर लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत अपूर्ण ई-केवायसी, चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे, पात्रता निकष पूर्ण न करणे आणि वैयक्तिक माहितीतील विसंगती आढळलेल्या अर्जदारांना योजनेतून वगळण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. त्यामुळे आता मुदतवाढ देण्याचा किंवा अतिरिक्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही.
दरम्यान, अनेक महिलांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या मोठा फटका ठरत आहे. नियमित मिळणारी मासिक मदत अचानक बंद झाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे. यापूर्वी मुदतवाढ मिळाल्यामुळे यावेळीही सरकार वेळ वाढवेल, अशी अनेक लाभार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र पडताळणीनंतर हजारो नव्हे तर लाखो महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी सरकारकडून नव्या नोंदणीसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, योजनेचा लाभ केवळ पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच दिला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


