Rajya Sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत दोन केंद्रीय मंत्र्यांना स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही.
रवनीत सिंग बिट्टू हे राजस्थानमधून, तर जॉर्ज कुरियन हे मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपत असून पक्षाने त्यांना पुन्हा संधी न दिल्याने केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. आता बिट्टू आणि कुरियन यांना उमेदवारी न मिळाल्याने संघटनात्मक बदलांच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
दरम्यान, भाजपने यावेळी नव्या चेहऱ्यांवर भर दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना पहिल्यांदाच राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. तसेच बीजेडीमधून भाजपमध्ये आलेल्या देबाशीष सामंतराय यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गुजरातमधून राजुभाई शुक्ला, मुकेशभाई रथवा, मानसिंग परमार आणि जितेंद्र कांजरिया या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर ईशान्य भारतातून मणिपूर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी आणि अरुणाचल प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष ताई तागाक यांची निवड करण्यात आली आहे.
झारखंड आणि कर्नाटकमधील जागांसाठी भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नसल्याने उर्वरित जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता कायम आहे. दरम्यान, नियमांनुसार राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही मंत्री सहा महिन्यांपर्यंत पदावर राहू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवसांत केंद्र सरकार आणि भाजप संघटनेत आणखी मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


