Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेगाने आगेकूच करत गोव्यात प्रवेश केला असून महाराष्ट्रातही पुढील काही तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आज मुंबई, ठाणे आणि पालघरसह उत्तर कोकणातील भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय राज्यातील विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मान्सूनने ४ जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. यंदा त्याचे आगमन सरासरीपेक्षा तीन दिवस उशिरा झाले. त्यानंतर ५ जून रोजी मान्सूनने गोव्याच्या काही भागांपर्यंत मजल मारली असून पूर्व-मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्येही त्याची प्रगती सुरू आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची सध्याची सीमा पणजी, बंगळूर, सालेम आणि पंबन बेटापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे तळ कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये लवकरच मान्सूनच्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या अधिकृत आगमनाकडे लागले असून आगामी काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


