Pune International Airport: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या पुनर्बांधणी आणि देखभालीच्या कामांमुळे विमानसेवा काही दिवस पूर्णपणे ठप्प होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. देशातील इतर लष्करी विमानतळांप्रमाणे पुण्याचे विमानतळ बंद न ठेवता, हवाई वाहतूक सुरळीत सुरू ठेवूनच हे काम केले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच जुने टर्मिनलही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
प्रवाशांची कोंडी टाळण्यासाठी दोन तासांच्या ‘विंडो’मध्येच होणार काम
भारतीय हवाई दलाच्या (IAF) वतीने उड्डाण सुरक्षा आणि धावपट्टीच्या सक्षमीकरणासाठी जोधपूर, श्रीनगर, आदमपूर आणि पुणे या चार महत्त्वाच्या विमानतळांच्या नूतनीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इतर विमानतळे वेगवेगळ्या महिन्यांत काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहेत. मात्र, पुण्यातून दररोज सुमारे २०० विमानांची उड्डाणे होत असल्याने विमानतळ पूर्ण बंद करणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरले असते. ही अडचण लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने हवाई दलाला विनंती केली होती. त्यानुसार, दररोज सकाळी विमानांची वाहतूक नसलेल्या दोन तासांच्या वेळेतच (मेंटेनन्स ब्लॉक) दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास हवाई दलाने मंजुरी दिली आहे.
जुन्या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात; बर्ड हिट रोखण्यासाठी उपाययोजना
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या तेथे केवळ सुरक्षा यंत्रणा आणि उपकरणे बसवण्याचे काम सुरू असून, सुरक्षा तपासणीचा (सिक्युरिटी क्लिअरन्स) हिरवा कंदील मिळताच हे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले केले जाईल. याशिवाय, धावपट्टी परिसरात विमानांना होणारे पक्षांचे अपघात (बर्ड हिट) रोखण्यासाठी हवाई दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये धावपट्टीच्या आजूबाजूचे गवत कापून स्वच्छता करण्यात आली असून, पक्षांना दूर पळवणारी अत्याधुनिक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
विमानतळ परिसरात रेंगाळणाऱ्या वाहनांना ५०० रुपयांचा फटका
विमानतळावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने आता शिस्तीचा बडगा उगारण्याचे ठरवले आहे. विमानतळाच्या आगमन (Arriving) गेटजवळ प्रवाशांना घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांना केवळ १५ मिनिटे थांबण्याची परवानगी आहे. मात्र, अनेक चालक नियमांचे उल्लंघन करून अर्धा-अर्धा तास वाहने उभी ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासनाकडून थेट ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याची कडक कारवाई केली जाणार आहे.


