Dr BT Deshmukh : विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्राला दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अमरावती येथे निधन झाले.
त्यांच्या निधनाने शिक्षक, पदवीधर आणि सामाजिक चळवळींना एक सक्षम नेतृत्व गमवावे लागले असून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अभ्यासू आणि निस्पृह पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सलग तीन दशकांहून अधिक काळ विधान परिषदेत शिक्षक आणि पदवीधरांचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख हे ‘नुटा’ (NUTA) संघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. आकडेवारी, तथ्ये आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर सभागृहात सरकारला जाब विचारण्याची त्यांची शैली विशेष गाजली. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न त्यांनी सातत्याने राज्य पातळीवर मांडत या भागाच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ५ वाजता अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांना आपले वैयक्तिक मार्गदर्शक संबोधले. “महाराष्ट्र एका संघर्षशील आणि अभ्यासू नेतृत्वाला मुकला आहे. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा मार्गदर्शक हरपला आहे,” अशा शब्दांत त्यांनी दुःख व्यक्त केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. देशमुख यांनी ज्या तत्त्वांसाठी संघर्ष केला त्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शिक्षक, प्राध्यापक आणि समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. विधान परिषदेतील त्यांची भाषणे आजही नव्या सदस्यांसाठी प्रेरणादायी आहेत.
विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी दिलेला लढा विशेष उल्लेखनीय होता. सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी त्यांनी थेट न्यायालयीन लढाही उभारला होता. तसेच सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि अमरावती विद्यापीठाच्या उभारणीतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू संसदीय नेता, शिक्षण क्षेत्रातील विचारवंत आणि समाजहितासाठी झटणारा संघर्षशील व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.


