Konkan News : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून फिरण्यासाठी आलेल्या ८ पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात बेपत्ता झाले असून ३ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पर्यटकांचा हा गट समुद्रात उतरला होता. मात्र, भरती आणि समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा योग्य अंदाज न आल्याने सर्वजण खोल पाण्याकडे वाहून जाऊ लागले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षक, नागरिक आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर ८ पैकी ३ पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, उर्वरित ५ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.
दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक पथके आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.
अद्याप बेपत्ता पर्यटकांचा ठावठिकाणा लागलेला नसून, समुद्रातील परिस्थिती लक्षात घेऊन शोधकार्य सुरू ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना आणि समुद्रात उतरताना पर्यटकांनी स्थानिक प्रशासन व जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, तसेच भरतीच्या काळात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


