भोकरदन: गणपती इंग्रजी माध्यम शाळेतील निवासी आदिवासी वसतिगृहातील सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. बालवीर अजय पवार (७) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून, तो इयत्ता पहिलीत शिकत होता. दोन दिवसांपूर्वी काही विद्यार्थ्यांसोबत बालवीरचा वाद झालेला होता, त्याच वादातून वसतिगृहातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी रात्री त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर बालवीर वसतिगृहातील आपल्या रूममध्ये झोपला होता. सकाळी इतर विद्यार्थी झोपेतून उठले. मात्र, बालवीर उठत नसल्याने काहींनी त्याचा श्वास तपासला असता तो श्वास घेत नसल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या गळ्यावर आवळण्याच्या खुना आढळून आल्याचे शाळा प्रशासनास व नातेवाईकांच्या लक्षात आले.
दरम्यान, मयत मुलाची आई सखू अजय पवार (२५, रा. पाडळी, ता. परतूर) यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भोकरदन येथील श्री गणपती हॉस्टेल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून २८ ऑगस्ट २०२४ मध्ये त्याला दाखल केले होते. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर १० जुलै रोजी मुलगी गौरी व मुलगा बालवीर यांना शाळा सुरु झाल्यामुळे श्री गणपती हॉस्टेल भोकरदन येथे सोडण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. २२) शाळेतून निरोप आल्यानंतर भोकरदन येथे मयत मुलाची आई व अन्य नातेवाईक आले. त्यांनी मृतदेह पाहिला असता गळ्यावर आवळण्याचे निशान दिसले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


