मुंबई : अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सणसणीत टीका केली आहे. माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध उत्खननाची तपासणी करणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्याशी अजित पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर राऊत यांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना धमकावल्याचा आरोप राऊत यांनी केला असून, त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घणाघात केला आहे.
काय आहे अंजली कृष्णा प्रकरण
माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाची माहिती मिळाल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांनी कारवाईसाठी पाऊले उचलली. यावेळी गावकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि पवारांनी व्हिडिओ कॉलद्वारे अंजली कृष्णा यांच्याशी संवाद साधला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांवर टीकेची झोड उठली आहे. राऊत यांनी या प्रकरणाला “राज्याच्या तिजोरीला चुना लावणारे” आणि “भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे” असे संबोधले.
संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊत यांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “शिंदे आणि पवार यांच्याकडे जे लोक आहेत, ते सगळे चोर, डाकू, स्मगलर आणि बलात्कारी आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठीच या लोकांना सत्ता हवी आहे. मावळमधील सुनील शेळके यांच्या अवैध खाणकाम प्रकरणाचा मी पर्दाफाश केला. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा चुना सरकारला लावला आणि अजित पवार त्यांना संरक्षण देत आहेत.”
राऊत पुढे म्हणाले, “70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप खुद्द पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर केला होता. आता तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत आहात? तुम्ही म्हणता की तुम्ही बेशिस्त खपवून घेत नाही, मग ही कोणती शिस्त आहे? एका तरुण आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही बेकायदेशीर कामांना पाठिंबा देण्यास सांगता. हे चालणार नाही!”
“अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही”
राऊत यांनी अजित पवारांवर नैतिकतेच्या मुद्द्यावरून टीका करताना म्हटले, “एका आयपीएस अधिकाऱ्याला धमकावून तुम्ही तुमच्या पक्षातील चोरांना संरक्षण देत आहात. मिस्टर अजित पवार, तुमची शिस्त कुठे गेली? अवैध मुरूम उत्खनन म्हणजे राज्याच्या तिजोरीला लुटणे. तुम्ही अर्थमंत्री असताना असे प्रकार घडतात, यामुळे तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही. यापूर्वी अनेकांना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामे द्यावे लागले आहेत.”
“महाराष्ट्राला चोरांचे राज्य बनवले”
राऊत यांनी थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत म्हटले, “तुम्ही दोघांनी मिळून अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. आता उरलेला महाराष्ट्र तुमच्या हस्तकांनी लुटावा म्हणून तुम्ही प्रशासनावर दबाव टाकत आहात. महाराष्ट्राच्या उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावत आहात. तुम्ही चोरांचे सरदार आहात आणि महाराष्ट्राला चोरांचे राज्य बनवत आहात.”


