छत्रपती संभाजीनगर : वेरूळ घाटात काल 11 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. आयशर ट्रक आणि 16 टायर ट्रकच्या समोरासमोर धडकेत औद्योगिक टँकर रस्त्यावर आडवा पडला, त्याखाली दबून कचरू सांडू त्रिभुवन (वय 42) आणि त्यांच्या सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे वेरूळ घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
वेरूळ लेणी क्रमांक एकच्या वरच्या बाजूस असलेल्या घाटात कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा आयशर ट्रक आणि खुलताबादहून कन्नडकडे निघालेल्या 16 टायर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत आयशर ट्रकमधील औद्योगिक टँकरचा बेल्ट तुटला आणि टँकर रस्त्यावर आडवा पडला. या दुर्घटनेत कचरू त्रिभुवन आणि त्यांच्या सासू चंद्रभागाबाई भालेराव टँकरखाली दबले गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कचरू त्रिभुवन हे खुलताबाद येथील राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या आपल्या सासू चंद्रभागाबाई यांना घेऊन खुलताबादला निघाले होते. मात्र, हा अपघात त्यांच्यासाठी काळ बनून आला.
अपघातानंतर तातडीने कचरू त्रिभुवन आणि चंद्रभागाबाई यांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेने खुलताबाद आणि वेरूळ परिसरात शोककळा पसरली आहे. दोन निष्पाप जीवांच्या अकाली मृत्यूमुळे स्थानिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातामुळे वेरूळ घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनांना बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, याप्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.
वेरूळ घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिकांनी घाटातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त होत आहेत.


