बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या अलीकडील चिंतन शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक मागासलेपणावर आरक्षणाची मागणी करून वादग्रस्त वक्तव्य केले. याला ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे.
“सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ताईंना सामाजिक मागासलेपण काय कळणार?” असा चिमटा काढत केदार यांनी आर्थिक निकषावरील आरक्षण ही ‘भाजप-आरएसएसची भाषा’ असल्याचा आरोप केला. त्यांनी सुप्रिया सुळे यांना माफी मागण्याचा इशारा देत, “माफी मागा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू!” अशी धमकीही दिली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही टीका राजकीय वातावरण ढवळून निघाली असून, दलित-ओबीसी संघटनांमध्ये रोषाची लाट उसळली आहे.
सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य काय?
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात सुप्रिया सुळे यांनी आरक्षणावरील चर्चेत आर्थिक मागासलेपणाला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, “आरक्षण हे अशांसाठी जे शिक्षण किंवा संधींपासून वंचित आहेत. मुंबईत माझे मूल चांगल्या शाळेत शिकत असेल, तर चंद्रपूरमधील एक हुशार मूल मात्र अशा संधींपासून वंचित आहे. आरक्षण फक्त गरजूंसाठी असावे, ज्यांना खरोखरच त्याची गरज आहे.” हे वक्तव्य मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर आले असून, VBA चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यावर टीका केली.
घराणेशाहीत जन्मलेल्यांना दलित दुःख कळणारच कसं?
बुलढाण्यात बोलताना दीपक केदार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आरक्षणाविरोधी ताई सोन्या-चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मल्या, त्यांना दलित, आदिवासींचे सामाजिक मागासलेपण काय कळणार? फुले, शाहू, डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आरक्षण नाकारणाऱ्या प्रवृत्ती जन्मल्या, याची आम्हाला लाज वाटते! आर्थिक निकषावरील आरक्षण ही संघ-भाजपची भाषा आहे.
आता तुमचा पक्ष भाजपात विलीन करा!” केदार यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले, “आरक्षणवादी आव्हाड हाताची घडी तोंडावर बोट का? गुलामी सोडा आणि बोला हे आर्थिक निकष मान्य आहे का?”
त्यांनी कंगना राणावत यांच्याशी तुलना करत सुप्रिया सुळे यांना ‘मनुवादी बी-टीम’ म्हटले. “बापाच्या घराणेशाही आरक्षण काय बोलता? बिहार निवडणुकीत मनुवादी बी-टीम म्हणून काम करताय का?” असा सवाल केदार यांनी विचारला. मराठा आरक्षणाच्या चर्चेत ‘आरक्षणच नाकारता कामा नये’, असेही ते म्हणाले.
रस्त्यावर उतरण्याचा इशारा; पँथर सेनेची धमकी
दीपक केदार यांनी सुप्रिया सुळे यांना स्पष्ट इशारा देत म्हटले, “पुरोगामी विचारधारेचे मनुवादी झालात. माफी मागा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू!” ऑल इंडिया पँथर सेनेने मराठा आरक्षणाच्या नावाखाली दलित-ओबीसी हक्कांचा बळी जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. केदार यांनी शरद पवार गटाला ‘भाजपची बी-टीम’ ठरवत, बिहार निवडणुकीतही अशीच भूमिका घेण्याचा आरोप केला. ही टीका मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आली असून, राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


