पुणे : महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिवसह मराठवाडा आणि इतर अनेक भागांत मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबतही अनिश्चितता कायम आहे.
पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे पुढील तीन दिवस (23 ते 25 सप्टेंबर) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात पडेल. मात्र, 24 सप्टेंबरला नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व आणि दक्षिण भागांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
मान्सून परतीच्या प्रवासाबाबत अनिश्चितता
हवामान खात्याने सांगितले की, मॉन्सूनने गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून परत फिरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा अंदाज सध्या बांधता येत नाही. कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतरच मॉन्सूनच्या परतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जिल्हानिहाय अंदाज
23 सप्टेंबर: कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस.
26-28 सप्टेंबर: राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोर वाढण्याची शक्यता.
27 सप्टेंबर: विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
28 सप्टेंबर: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कायम राहील.
नागरिकांना सावधगिरीचा इशारा
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायंकाळी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने प्रवास करताना खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचेही आवाहन आहे.
शेतीचे नुकसान
मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. पावसाचा जोर पाहता, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


