नंदुरबार: शहरातील मार्केट परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत एका तरुणाची किरकोळ वादातून चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. सिंधी कॉलनी परिसरातील भैय्या मराठे या व्यक्तीने जय भिलवर प्राणघातक हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या जय भिलला उपचारासाठी सुरत येथे हलवले गेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर आदिवासी समाजात संताप पसरला असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाच्या समर्थनार्थ नंदुरबार जिल्ह्यात मूक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. सुरुवातीला शांततेत सुरू असलेला मोर्चा काही वेळात हिंसक वळण घेऊ लागला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.
आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेकही झाली. या संघर्षात एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्यासह अनेक जखमी झाले असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नंदुरबार शहरातील आदिवासी समाज बांधव आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी ठाम भूमिका घेत आहेत. त्यांचा आग्रह आहे की आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण कायम असून प्रशासन नागरिकांमध्ये शांतता राखण्यासाठी सतर्कतेने उपाययोजना करत आहे.


