Gautami Patil Pune Crime : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर रोजी मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ घडलेल्या एका गंभीर अपघातामुळे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात गौतमी पाटील यांच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या एका भरधाव कारने उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गौतमी पाटील यांना नोटीस बजावली असून, चौकशीला गती दिली आहे.
या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे. कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, याच चंद्रकांत पाटील यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावर मौन बाळगल्याने त्यांच्या या निवडक आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गौतमी पाटील यांच्यावर पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील एका हॉटेलसमोर घडला. रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे यांची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती, ज्यामध्ये दोन प्रवासी होते. यावेळी गौतमी पाटील यांच्या नावावर नोंदणीकृत असलेली एक कार भरधाव वेगाने आली आणि तिने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, आणि रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी बजावली गौतमी पाटीलला नोटीस
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या अपघातास कारणीभूत असलेल्या 30 वर्षीय कारचालकाला अटक केली आहे. अपघातानंतर हा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता, परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी गौतमी पाटील यांना नोटीस बजावली असून, त्यांच्या कारच्या मालकीमुळे त्यांचीही चौकशी होत आहे. या प्रकरणात गौतमी पाटील यांच्या कारचालकाची चूक असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
मरगळे कुटुंबीयांचे गंभीर आरोप
या अपघातानंतर रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, गौतमी पाटील यांच्या टीमने या प्रकरणाची कोणतीही दखल न घेतल्याने कुटुंबीयांमध्ये संताप आहे. जखमी रिक्षाचालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
चंद्रकांत पाटलांचा हस्तक्षेप आणि वाद
या अपघात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांच्याशी संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. मात्र, त्यांनी याच वेळी कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिक आणि राजकीय विश्लेषक यामुळे चंद्रकांत पाटलांच्या निवडक सक्रियतेवर टीका करत आहेत.


