पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजप नेते, विशेषतः चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महायुतीत दंगा नको’ असा सल्ला दिला होता. मात्र, धंगेकर यांनी यावर तलवार म्यान करण्यास नकार देत एका वृत्त वाहिनीशी बोलताना ठाम भूमिका मांडली आहे.
मी पुणेकरांसाठी बोलतोय, यामुळे माझं राजकीय नुकसान होत असलं तरी त्याची किंमत मोजायला तयार आहे, असं धंगेकर म्हणाले. त्यांनी पुण्याला भयमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करण्याची मागणी कायम ठेवत भाजप नेत्यांना ‘स्वतःला आरशात पाहण्याचा’ टोलाही लगावला.
पुणे भयमुक्त हवं, धंगेकरांचा निर्धार
रवींद्र धंगेकर यांनी शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत म्हटलं, काल शिंदे साहेबांनी जी भाषा वापरली, ती माझीच होती. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त आणि भयमुक्त व्हायला हवं. मी कोणावर वैयक्तिक टीका केली नाही, फक्त पुण्यातील प्रमुख भाजप नेत्यांना प्रश्न विचारले. मी कालही टीका करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करेन. पबवर बोललो तेव्हा ते माझ्याविरुद्ध उभे राहिले, पोर्शे प्रकरणात बोललो तेव्हा ते माझ्याविरोधात गेले. गुन्हेगारही माझ्याविरुद्ध आहेत, पण माझं म्हणणं स्पष्ट आहे. पुणे भयमुक्त व्हायलाच हवं. धंगेकरांनी शिंदे यांच्या पाठिंब्याचा दाखला देत सांगितलं की, शिंदे यांनाही गुन्हेगारी नको आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगताना म्हटलं, रवींद्र धंगेकर यांना मी सांगितलं आहे की महायुतीत दंगा नको. पण त्यांचं म्हणणं आहे की, पुण्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. लेकी-बाळींना सुरक्षित फिरता आलं पाहिजे, सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये. गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत माफी नाही, मग तो कुणीही असो. पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करू. गृहखातं माझ्याकडे आहे, पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करत आहेत. गुंडागर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शिंदे यांनी पुणे गुन्हेगारीमुक्त करण्याचं आश्वासन दिलं.
धंगेकरांचा भाजपवर हल्ला
धंगेकरांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजप नेत्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. भाजपचे नेते माझ्यावर टीका करतात, पण त्यांनी स्वतःला आरशात पाहावं. मी पब आणि पोर्शे प्रकरणात बोललो, कारण पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, पण प्रश्न विचारणं थांबवणार नाही, असं त्यांनी ठणकावलं. त्यांनी पुण्यातील पब संस्कृती आणि पोर्शे अपघात प्रकरणाचा उल्लेख करत स्थानिक भाजप नेतृत्वावर गुन्हेगारीला पाठबळ देण्याचा आरोप केला.


