Yavatmal Crime : जेवणात मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका महिलेचा बळी घेतला आहे. पतीचा संशयी स्वभाव आणि मित्रासमोर झालेल्या अपमान सहन न झाल्याने चेतना मनोज जाधव या २८ वर्षीय गृहिणीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती मनोज जाधव याने एका मित्राला घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. मटणाचा बेत असताना, पाहुण्यासमोर जेवण वाढले जात असताना मनोजला मटण अर्धवट शिजल्याचे जाणवले. याचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीला सर्वांसमोर अत्यंत खालच्या भाषेत सुनावले. हा वाद केवळ अन्नापुरता मर्यादित न राहता, मनोजने जुन्या वादांनाही फोडणी दिली.
छळाचा जुना इतिहास
मनोजला दारूचे व्यसन असून तो वारंवार चेतनाचा छळ करत होता. २०१५ मध्येही त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु संसारासाठी चेतनाने २०१७ मध्ये त्याला माफ करून पुन्हा नांदायला सुरुवात केली होती. मात्र, बुधवारी भरल्या ताटावर पतीने केलेला अपमान चेतनाच्या जिव्हारी लागला. संताप आणि वैफल्यातून तिने घरात असलेले विषारी औषध प्राशन केले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
विष प्यायल्यानंतर चेतनाने स्वतः ही बाब पतीला सांगितली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
आरोपी पती गजाआड
याप्रकरणी मृत चेतनाच्या मामांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.


