पुणे: वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शत्रू टोळीतील सदस्यांवर पाळत ठेवणाऱ्या दत्ता बाळू काळेला पोलिसांनी अटक केली. मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी सापळा रचून दत्ता काळेला अटक केली. सोमनाथ गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांच्या घरावर दत्ता बाळू काळेने पाळत ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो रणनीती आखत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तपासातून अनेक जण पाळत ठेवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर टोळीतील आरोपींना अटक करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले.
अटकेची कुणकुण लागताच दत्ता काळे फरार होता. भारती विद्यापीठ पोलीस त्याच्या मागावर होते. स्वारगेटच्या एका चित्रपटगृहाच्या परिसरात दत्ता काळे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने केली.
पुण्यातील नाना पेठेत वर्चस्वातून आणि कौटुंबिक वादातून महाविद्यालयीन तरुण आयुष कोमकरचा खून करण्यात आला. आयुषच्या हत्या प्रकरणात त्याचे सख्खे आजोबा बंडू आंदेकर, त्याचा मामा कृष्णा आंदेकर आणि इतरही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सगळे आरोपी अटकेत आहेत. आंदेकर टोळीतील सदस्यांनी आयुषच्या खुनाचा कट वानवडीत रचल्याचा संशय पुणे पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला. खून करण्यापूर्वी सदस्यांच्या अनेक वेळा वानवडी परिसरात बैठका झाल्या. महत्त्वाचे म्हणजे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाताला लागू नये म्हणून आरोपी मोबाईल घरी ठेवून एकमेकांना भेट असत, असे पोलिसांच्या चौकशी दरम्यान समोर आले.


