पुणे : राजगड तालुक्यातील शिरकोली परिसरात डानंगे खिंड येथे धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीत पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.
रमाबाई मरगळे (वय ५५, रा. डानंगे खिंड, शिरकोली) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री रमाबाई घरी पाण्याची कमतरता असल्याने विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीच्या कडेला उभे राहताना त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट खोल विहिरीत कोसळल्या. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मदतीसाठी आरडाओरडाही केली, मात्र परिसरात कुणालाही कळले नाही. पोहणे येत नसल्याने त्या पाण्यात बुडून गेल्या.
काही वेळाने कुटुंबीयांनी रमाबाई शोधण्यास सुरुवात केली, पण त्या सापडल्या नाहीत. अखेर विहिरीतून मृतदेह तरंगत येताना दिसला. गावकऱ्यांनी विहिरीत मृतदेह पाहिला आणि तात्काळ वेल्हे पोलिस स्टेशनला सूचना दिली. रात्रीचा सुमार असल्याने पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बॅटरीच्या उजेडात मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात दुर्घटना असल्याचे सांगितले जात असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. विहिरीच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


