Beed Crime: नियतीचा घाला आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका बळीराजाचा करुण अंत झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे घडली आहे. नापिकीमुळे रिकामा झालेला खिसा आणि पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे हतबल झालेल्या सुधाकर संत (वय 55) या शेतकऱ्याने शनिवारी पहाटे मृत्यूला कवटाळले. गावातील हनुमान मंदिरासमोरील टॉवरला गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजारपण आणि कर्ज, दुहेरी संकटाची कात्री
भोजगाव येथील रहिवासी असलेले सुधाकर संत अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या पत्नी संजीवनी संत या गेल्या काही काळापासून अर्धांगवायूने (पॅरालिसिस) ग्रस्त आहेत. त्यांच्या महागड्या उपचारांसाठी सुधाकर यांनी खासगी सावकारांकडून मोठे कर्ज घेतले होते. शेतीसाठी बँकेचे कर्ज काढले होते, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हाती आले नाही. कर्ज कसे फेडायचे आणि आजारी पत्नीचा जीव कसा वाचवायचा, या विवंचनेतून ते गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होते.
गाव हादरलं, पहाटेच घडला थरार
नेहमीप्रमाणे काम उरकण्यासाठी घराबाहेर पडलेले सुधाकर शनिवारी सकाळी हनुमान मंदिरासमोरील टॉवरवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. ग्रामस्थांनी हे दृश्य पाहताच गावात एकच खळबळ उडाली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सुधाकर यांनी आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याने संत कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. त्यांच्या पश्चात आजारी पत्नीसह एक मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृताच्या पुतण्याने दिलेल्या माहितीनुसार, गेवराई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजारी पत्नीचा आधार आणि कुटुंबाचा कणा हरपल्याने भोजगाववर शोककळा पसरली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व्यथा पुन्हा एकदा समोर आली आहे.


