मुंबई : शेअर मार्केटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. त्यातच मागील आठवडा शेअर बाजारासाठी एक उत्तम आठवडा ठरला. मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्समधील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ झाली.
बाजारमूल्यात वाढ झालेल्या यादीत मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलपर्यंत आणि टाटा कन्सल्टन्सीपासून इन्फोसिसपर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे बाजारमूल्य ₹१.९४ लाख कोटींनी वाढले. टीसीएसच्या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी सर्वात जास्त नफा मिळवला, फक्त पाच ट्रेडिंग दिवसांत ४५००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. गेल्या आठवड्यात अनेक प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे शेअर बाजाराला चालना मिळाली.
संपूर्ण आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १२९३.६५ अंकांनी वाढला. सेन्सेक्सच्या ज्या आठ कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले त्या म्हणजे आरआयएल, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस या कंपन्यात आहेत. त्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे १९४१४८.७३ कोटींची वाढ झाली.


