Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले, यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडची वर्सटाईल गायिका म्हणून आशा भोसले प्रसिद्ध होत्या. आशाताईंनी अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज दिलाय. अगदी गझल, अभंग, भूपाळी पासून थेट तरुणांच्या मनाला भिडणारी ‘दम मारो दम’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या गाण्यांपर्यंत आशाताईंनी अनेक गाणी गायलीत. त्यांनी तब्बल सहा दशकं इंडस्ट्रीसाठी नवनवीन गाणी गायली, एवढंच नाहीतर त्यांनी गाणी गाताना अनेक नवनवे प्रयोगही केलेत. पण, एका पॉडकास्टमध्ये बोलताना आशा भोसले यांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केलेली. सध्या त्यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आशाताईंनी शेवटची इच्छा म्हणून देवाकडे मागितलेलं मागणं ऐकून डोळे पाणावतात.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान, या दिग्गज गायिकेनं आपली अखेरची इच्छा व्यक्त केलेली. या इच्छेवरून हे अगदी स्पष्ट होतं की, आपल्या कलेवर, म्हणजेच गायनावर, त्यांचं नितांत प्रेम आहे आणि याच कलेत मग्न असतानाच आपला अखेरचा प्रवास सुरू करावा, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे.
“माझं देवाकडे एकच मागणं आहे, मी गात असतानाच, मला मरण यावं… बास्स…”
अमृता रावच्या पॉडकास्टमध्ये बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, “माझं देवाकडे एकच मागणं आहे, मी गात असतानाच, मला मरण यावं… बास्स… हीच माझी मनापासून इच्छा आहे. आता माझ्यासाठी शिकण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आता आणखी काय शिकायचं बाकी आहे? गाणं हेच माझं आयुष्य आहे. मी अगदी बालपणापासून गात आलेय, विशेषतः वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मी माझ्या वडिलांकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केलेली. माझं संपूर्ण आयुष्य मी याच कलेला समर्पित केलंय. मी सिनेसृष्टीत 80 ते 82 वर्ष व्यतीत केली आहेत आणि आता, माझी अंतिम इच्छा केवळ हीच आहे की, मी या जगाचा निरोप घ्यावा. जर गात असतानाच मी या जगातून एक्झिट घेतली, तर त्यामुळे मला सर्वाधिक आनंद होईल…” आशा भोसले यांचा हा व्हिडीओ सध्या त्यांच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तो पाहून अनेक प्रेक्षक अत्यंत भावूक झाले आहेत.
दरम्यान, आशा भोसले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदी सिनेसृष्टीला समर्पित केलंय. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या आशाताईंच्या मोठी बहीण. लतादीदींप्रमाणेच, त्यांनीही अगदी लहान वयातच गायिका म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलंय. आठ दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत, त्यांनी 14,000 हून अधिक गाणी गायलीत, त्यांच्या या तब्बल सहा वर्षांच्या कारकीर्दीत सिनेमे आणि अल्बम्स अशा दोन्ही प्रकारच्या गाण्यांचा समावेश आहे. 1943 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंनी 20 हून अधिक भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिलाय. बॉलिवूडमध्ये, ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतचे त्यांचे सांगीतिक सहकार्य अत्यंत गाजलं आणि सुपरहिट ठरलं. त्यांच्या अविस्मरणीय गीतांमध्ये ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’ आणि ‘आईये मेहरबान’ यांसारख्या सदाबहार आणि अजरामर गीतांचा समावेश आहे.


