शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून वैतागलेल्या अरुण काळे (वय 30) याने आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील रहिवासी असलेल्या अरुण काळे याची पत्नी आठ दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या अरुणने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवारातील एका विहिरीत आपल्या मुलांना ढकलले आणि स्वतःही हात-पाय बांधून विहिरीत उडी घेतली.
शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे (वय 5) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर दोन मृतदेहांचा शोध अद्याप सुरू आहे. अरुण काळेचा मृतदेह हात आणि पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत सापडला, त्यामुळे त्याने स्वतःच हात-पाय बांधून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अक्खा गाव स्तब्ध
अरुण काळेने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. ही विहीर कोऱ्हाळे गावच्या शिवारात आहे, आणि या ठिकाणी मृतदेह सापडल्याने अक्ख गाव स्तब्ध झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अरुणच्या पत्नीने घर का सोडलं आणि या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण काय, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेने कोऱ्हाळे आणि चिखली कोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.


