Maharashtra Politics: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने अत्यंत सावधपणे चाल खेळत आपल्या मित्रपक्षांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. राज्यातील महामंडळ वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू असतानाच, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी अॅड. संजय पुराणिक यांची वर्णी लावून भाजपने या प्रतिष्ठेच्या पदावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दोन्ही मित्रपक्षांच्या दाव्यांना केराची टोपली
बाल हक्क आयोगाचे अध्यक्षपद काबीज करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मोठी चढाओढ सुरू होती. मात्र, भाजपने या दोन्ही मित्रपक्षांना बाजूला सारत आपल्या हक्काच्या माणसाची नियुक्ती करण्यात यश मिळवले आहे. माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हे पद आपल्याकडेच राहावे, असा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आग्रही पवित्रा होता. तथापी, महिला आयोगाच्या धर्तीवर बाल हक्क आयोगावरही आपला ताबा असावा, यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून मोठ्या हालचाली सुरू होत्या.
गुप्तता पाळत भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’
३ मे २०२५ रोजी सुशीबेन शहा यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद चर्चेत होते. विशेष म्हणजे, मित्रपक्षांकडून होणारा विरोध किंवा नाराजी टाळण्यासाठी भाजपने अत्यंत गुप्त पद्धतीने संजय पुराणिक यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली. पुराणिक हे संघ परिवारातील निष्ठावान चेहरा मानले जातात. या नियुक्तीद्वारे भाजपने महायुतीमध्ये आपलाच शब्द अंतिम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सुशीबेन शहा यांनी शिवसेनेत प्रवेश करूनही भाजपने त्यांना पुन्हा संधी न देता हे पद स्वतःच्या ताब्यात घेतल्याने, महायुतीत ‘मोठा भाऊ’ कोण, याचे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळात गेले आहेत.


