Rohit Pawar: धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केल्याने महाराष्ट्रात संतापाचा वणवा पेटला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि महापुरुषांच्या संदर्भात वारंवार होणाऱ्या वादग्रस्त विधानांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींना सरकार पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
काय आहे नेमक प्रकरण?
नागपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात, जिथे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारखे बडे नेते उपस्थित होते, तिथे बोलताना बागेश्वर बाबांनी इतिहासाचा विपर्यास केला. “शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकूट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती,” असा जावईशोध त्यांनी लावला. शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास नाकारणाऱ्या या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रोहित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यासपीठावरील नेत्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. “छत्रपतींचा अवमान होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे बडे नेते शांत कसे बसले?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा वेळी गप्प राहणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, वारंवार संत परंपरा आणि महापुरुषांबद्दल चुकीची विधाने करणे, हा महाराष्ट्राची अस्मिता कमी करण्याचा एखादा नियोजित ‘एककलमी कार्यक्रम’ तर नाही ना? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून… pic.twitter.com/fruZIuyZXH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 25, 2026
बागेश्वर बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत रोहित पवारांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये. सरकारने त्यांच्यावर तातडीने बंदी घालावी, अन्यथा हे सरकारला महागात पडेल,” असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. अशा प्रवृत्तींमुळे समाजात तेढ निर्माण होत असून, सरकारने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र पडसाद उमटतील, असे संकेत त्यांनी दिले.
‘आता शिवप्रेमी जनतेनेच धडा शिकवावा’
सरकार या प्रकरणावर ठोस कारवाई करेल अशी आशा नसल्याचे सांगत रोहित पवारांनी आता चेंडू जनतेच्या कोर्टात टाकला आहे. “प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा नाही, त्यामुळे आता सहन करायचे की धडा शिकवायचा, हे शिवप्रेमी जनतेनेच ठरवावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.


