पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने देशभरात खळबळ उडवली होती. दिल्लीच्या जंतरमंतरवर “मै हूँ अण्णा”च्या घोषणेने सत्तांतर घडवले, पण त्यानंतर अण्णा शांतच राहिले. आता पुण्यातून त्यांना पुन्हा आंदोलनासाठी आव्हान देणारे बॅनर झळकले आहेत.
पाषाण परिसरात लावलेल्या या बॅनरमधून अण्णांना पुणेरी शैलीत टोमणे लगावत, मतांची चोरी, भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीविरोधात आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली आहे.
“अण्णा, आतातरी उठा… कुंभकर्णसुद्धा रावणासाठी जागा झाला, तुम्ही देशासाठी कधी उठणार?” असा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर लावले असून, त्यातून अण्णांनी पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनाची जादू दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बॅनरमध्ये म्हटलंय, “देशात मतांची चोरी, भ्रष्टाचार, हुकूमशाही आणि लोकशाही धोक्यात असताना अण्णा तुम्ही शांत कसे?”
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ, बोगस मतदान आणि ईव्हीएम गैरव्यवहारांचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. शरद पवार यांनीही निवडणुकीपूर्वीच्या संशयास्पद भेटींचा उल्लेख करत वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून, अण्णा हजारे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


