Local Body Election: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आगामी काही दिवसांत मोठी हालचाल घडण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोग निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यभर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयानंतर 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात होईल.
विरोधकांची आक्षेपार्ह भूमिका
राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार याद्यांतील विसंगती दूर न करता निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे. मात्र आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण कराव्या लागणार असल्याने, निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे. मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या असून आयोगाने तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यासाठी अधिसूचना तयार ठेवली आहे.
तीन टप्प्यांत होणार निवडणुका
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडतील, असा संकेत मिळाला आहे.
- पहिला टप्पा: 289 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होईल. हा टप्पा सुमारे 21 दिवसांचा असेल.
- दुसरा टप्पा: 32 जिल्हा परिषदा आणि 331 पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. हा टप्पा सुमारे 30 ते 35 दिवस चालेल.
- तिसरा टप्पा: अखेरच्या टप्प्यात 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडतील. हा कार्यक्रम साधारणपणे 30 दिवस चालण्याची शक्यता आहे.
आरक्षण जाहीर, आता वेळापत्रकाची प्रतीक्षा
नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाची घोषणा आधीच झाली असून महापालिकांच्या आरक्षणाची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल. त्यामुळे आयोगाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सूत्रांनुसार, आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेत आयोग निवडणुकीची घोषणा करू शकतो, आणि याच क्षणापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आयोग सुरुवातीला 289 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करेल. ईव्हीएमची चाचणी, मतदार यादी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल.


