नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक चांगलीच रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण हे एकमेकांवर सतत टीकेची झोड उठवत असून, त्यामुळे महायुतीत अंतर्गत मतभेद अधिकच उघड होत आहेत.
अर्धापूर येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. ‘मी कुणालाही घाबरून पक्ष बदललेला नाही. माझ्या राजकीय प्रवासात मी कधीही कुणासमोर झुकलो नाही. आजवर 18 निवडणुका लढवल्या आणि 16 जिंकल्या आहेत. मागच्या दाराने कधीही काही मिळवले नाही, ना माझे वडील मंत्री होते, ना खासदार. जे काही मिळवलं ते थेट जनतेसमोर निवडणूक लढून,’ असे स्पष्ट वक्तव्य करत चिखलीकरांनी अप्रत्यक्षपणे राज्यसभेत मागच्या दाराने गेलेल्यांचा उल्लेख करून चव्हाण यांना टोला लगावला.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच चिखलीकरांवर पलटवार केला होता. ‘काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही. त्यांचा तो प्रश्न आहे. मला अशा गोष्टींना महत्त्व द्यायचं नाही. नांदेड जिल्हा टॉप टेनमध्ये यावा यासाठी मी काम करत आहे,’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे चिखलीकर यांची खिल्ली उडवली.
या परस्पर आरोप-प्रत्यारोपांच्या साखळीमुळे नांदेडमधील राजकारण तापले असून, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून येत असल्याचं चित्र आहे. स्थानिक पातळीवर एकत्र काम करण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांमध्ये सुरु असलेलं हे वाकयुद्ध आगामी निवडणुकांवर काय परिणाम करणार याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.


