Uddhav Thackeray: देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी परराज्यात फिरत आहेत, मात्र इकडे महाराष्ट्रात महिलांचे विनयभंग होत असून अमली पदार्थांचे रॅकेट उघड होत आहे,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. भारतीय कामगार सेनेच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी कामगार प्रश्न, महिला सुरक्षा आणि भाजपच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
‘१०० दिवस शेळी होण्यापेक्षा एक दिवस वाघ व्हा’
केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या वापरावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, भाजपची स्वतःच्या हिंमतीवर निवडणुका जिंकायची ‘औकात’ नाही, म्हणूनच ते ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) सारख्या फौजा घुसवतात. “तपास यंत्रणा बाजूला ठेवा आणि मग शिवसेनेचा सामना करा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले. तसेच, १०० दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा,” अशा शब्दांत त्यांनी पक्ष बदलणाऱ्यांना टोला लगावला.
महिला आरक्षणावरून फडणवीसांना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे ‘बुरखे फाडण्या’ची भाषा केल्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. “आम्ही हिंदू आहोत, बुरखे काय फाडणार? तुम्हाला महिला आरक्षणाचा एवढाच कळवळा असेल, तर संसदेचे उद्घाटन आणि राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलावले नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून त्यांना डावलले का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कामगार क्षेत्रातील ‘दुकानदारी’वर भाष्य
कामगार युनियनमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘मक्तेदारी’ आणि ‘दुकानदारी’वरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “माझे नातं कारखान्याच्या मालकाशी नाही, तर गेटवर लावलेल्या भगव्या झेंड्याशी आहे,” असे सांगत त्यांनी कामगारांना संघटित राहण्याचे आवाहन केले. परदेशातील युद्धाच्या परिस्थितीत अडकलेल्या भारतीय कामगारांचा उल्लेख करत त्यांनी केंद्रातील धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप केला.
‘महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवेल’
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, अन्यायाला मोडून काढणे हाच आपला ‘महाराष्ट्र धर्म’ आहे. “संभाजी महाराजांनी मरण पत्करले पण धर्म सोडला नाही, आपणही मेलो तरी चालेल पण पक्षांतर करणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उमेद भरली. औरंगजेबाला याच मातीत गाडणारा महाराष्ट्र धर्मच आज देशाला वाचवू शकतो, अशी सादही त्यांनी यावेळी घातली.


