Mother’s Name Mandatory: महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अधिकृत नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करणे बंधनकारक असणार आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून हा बदल लागू केला जाणार असून, यामुळे विद्यार्थ्याची ओळख आता मातेच्या नावानेही होणार आहे.
काय आहे नावाचा नवा क्रम?
यापूर्वी सामान्यतः ‘विद्यार्थ्याचे नाव + वडिलांचे नाव + आडनाव’ अशी पद्धत प्रचलित होती. मात्र, नव्या निर्णयानुसार आता खालीलप्रमाणे नोंद केली जाईल:
- विद्यार्थ्याचे नाव
- आईचे नाव
- वडिलांचे नाव
- आडनाव
हा नियम शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांना समान रीतीने लागू असेल. शाळेचे ओळखपत्र, हजेरीपट (Muster), गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (LC) आणि प्रवेश निर्गम उतारा या सर्व कागदपत्रांवर याच क्रमाने नावे दिसतील.
निर्णयामागचा उद्देश
केवळ नावाचा क्रम बदलणे हा यामागचा हेतू नसून, त्यामागे एक व्यापक सामाजिक विचार आहे. मुलाच्या जडणघडणीत आईच्या असलेल्या अतुलनीय योगदानाला अधिकृत ओळख मिळवून देणे. समाजात स्त्री-पुरुष समानता रुजवण्यासाठी आणि मातेला कुटुंबात बरोबरीचे स्थान देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने मंजूर केलेल्या चौथ्या महिला धोरणाची ही प्रभावी अंमलबजावणी मानली जात आहे.
विभक्त पालकांबाबत काय?
ज्या प्रकरणांमध्ये पालक घटस्फोटीत आहेत किंवा विभक्त राहत आहेत, तिथे परिस्थितीनुसार आणि कायदेशीर तरतुदींनुसार कोणाचे नाव लावायचे, याबाबत लवचिकता ठेवण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये आवश्यक ते बदल करून नोंद घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.
मंत्र्यांनीच घालून दिला होता वस्तुपाठ
काही काळापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या शासकीय दालनाबाहेरील नावांच्या पाट्यांवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावून या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याचेच प्रतिबिंब आता शालेय स्तरावरील कागदपत्रांमध्ये उमटताना दिसत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


