Eknath Shinde: मुंबई महानगरपालिकेत 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी झाली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 29 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र, भाजपला बहुमतासाठी आवश्यक असलेला 114 चा आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदे यांच्या 29 नगरसेवकांची साथ अनिवार्य आहे.
दरम्यान, महापालिका निकालानंतर आता महापौर पदाबाबत सस्पेंस कायम आहे. भाजपसह शिवसेना (शिंदे गट) ने आपल्या पक्षाच्या नेत्याला महापौर बनवण्याची मागणी केली आहे.
तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुंबईतील पेचाची दखल घेतल्याची माहिती पुढे येत आहे. महापौर पदाविषयी कुठली तडजोड न करण्याची पक्ष नेतृत्वाची ठाम भूमिका असल्याचे समजते. संख्याबळात सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने महापौर पदावर आपलाच हक्क आहे. ती बाब मित्रपक्षापर्यंत योग्य प्रकारे पोहचवा, असे संकेत भाजपच्या गोट्यातून देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतली?
यादरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर येत आहे. अचानकपणे शिंदे यांचा हा दिल्ली दौरा झाल्याने शिवसेना शिंदे गट अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे म्हटले जात आहे.
दिल्लीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत होते. दिल्लीतील बैठकीत महापौर आणि इतर समितीबाबत चर्चा केली असल्याचे म्हटले जात आहे.
नगरसेवक हॉटेलमध्ये तीन दिवसांसाठी बंद
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या मुंबईतील नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये तीन दिवसांसाठी ठेवले होते. मात्र त्यांच्याकडील निवडणूक आयोगाने दिलेले विजयी होण्याच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत शिंदे गटाने आपल्याकडे घेऊन नगरसेवकांना घरी जाण्याची दिली. त्यानंतरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते.


