Telangana Accident: तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात २० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिर्झागुडा परिसरातील खानपूर गेटजवळ टीजीएसआरटीसी (Telangana State Road Transport Corporation) च्या बसला खडी भरलेल्या टिप्पर ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात सकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास झाला. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खडी आणि ढिगाऱ्यात अडकली होती. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, चेवेल्ला पोलीस स्टेशन हद्दीतील या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा बचावकार्य सुरू आहे.
मंत्री पोन्नम प्रभाकर यांची प्रतिक्रिया
तेलंगणाचे मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी आरटीसीचे एमडी नागी रेड्डी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय सेवांमध्ये कोणतीही ढिलाई नको असे स्पष्ट निर्देश दिले. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, चुकीच्या दिशेने येणाऱ्या टिप्पर ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदतकार्य गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सीएस आणि डीजीपींना निर्देश दिले की, सर्व जखमींना तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात हलवून सर्वोत्तम वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करावी. तसेच उपलब्ध मंत्र्यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेशही दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आर्थिक मदत
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना ५०,००० इतकी आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने एका पोस्टद्वारे म्हटले आहे, ‘तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानी अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित कुटुंबियांसोबत आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.’


