Mumbai Mayor : गेल्या अनेक महिन्यांपासून रंगलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षाचा अखेर निकाल लागला आहे. ८९ जागांसह महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या निवडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘मविआ’ला मोठा धक्का बसला असून, मुंबई पालिकेतील शिवसेनेची २५-३० वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे.
सत्तेचे समीकरण: ‘महायुती’चे मुंबईवर वर्चस्व
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केली. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार, महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिंदे गटाला देण्यात आले आहे. मुंबईला सलग दुसऱ्यांदा महिला महापौर मिळणार असल्याने पालिकेत पुन्हा एकदा ‘महिलाराज’ पाहायला मिळेल.
- महापौर उमेदवार: रितू तावडे (भाजप)
- उपमहापौर उमेदवार: संजय घाडी (शिवसेना – शिंदे गट)
किशोरी पेडणेकर आता ‘विरोधी’ भूमिकेत
दुसरीकडे, ठाकरे गटाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. वॉर्ड क्रमांक १९९ मधून विजय मिळवणाऱ्या पेडणेकर यांची ‘उबाठा’ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईचे महापौरपद भूषवलेल्या पेडणेकर आता सभागृहात आक्रमक विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मुंबईच्या विकासाला मिळणार ‘डबल इंजिन’चा वेग?
केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने आता मुंबईच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोस्टल रोडचे पुढील टप्पे आणि मेट्रोच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. सत्तापालट झाल्यामुळे मुंबईच्या विकासकामांची दिशा आणि नियोजनात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


