इंदापूर: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल सुचविण्यात आले असून विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन हे या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सन २०४० पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्था बहुआयामी बनाव्यात, या उद्देशाने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्याल इंदापूर मधील ग्रंथालय विभाग, वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी “तंत्रज्ञान आणि शाश्वततेमधील आगामी प्रवाह” या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेची सुरुवात डॉ.शिवाजी वीर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर परिषदेच्या संयोजिका डॉ.मनीषा गायकवाड यांनी ई-परिषदेचा उद्देश व महत्त्व उपस्थितांसमोर मांडले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांवर भर
संस्थेचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी परिषदेचे अध्यक्ष या नात्याने उद्घाटनपर भाषण करताना “तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे” असे प्रतिपादन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत राहण्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रात विविध नव्या अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ.भरत भुजबळ यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. जीवन सरवदे यांनी सदर परिषदेस शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून अल-कुड्स ओपन युनिव्हर्सिटी, पॅलेस्टिनी प्रदेश येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुन्थर मोह’द इब्राहिम झ्यौद यांनी शाश्वत तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केला. या सत्रात डॉ.आर. आर. भोसले यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला, तर प्रा.मुक्ता पिसे यांनी आभार प्रदर्शन केले.
पहिल्या सत्रात डॉ.संगीता ढमढेरे ग्रंथपाल, ज्ञान संसाधन केंद्र, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज, मॉडर्न आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, गणेशखिंड, पुणे यांनी नवीन तंत्रज्ञानाचे विविध पैलू आणि त्याचा शिक्षण क्षेत्रावर, विशेषतः ग्रंथालय व माहितीशास्त्रावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनीषा जाधव होत्या, तर डॉ.तानाजी कसबे यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात डॉ. दृष्टी भद्रेश जोशी, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यांनी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील शाश्वत तंत्रज्ञानावर प्रकाश टाकत ब्लॉकचेन, ई-कॉमर्स व ई-ट्रेड यांसारख्या नव्या प्रवाहांवर चर्चा केली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. सदाशिव उंबरदंड होते, तर डॉ.आत्माराम फलफले यांनी आभार प्रदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात डॉ. एस. एस. मस्के, संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त), सोलापूर यांनी सामाजिक शास्त्रांतील नव्या प्रवाहांवर तसेच एआय तंत्रज्ञानाचा भूगोल व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.गजानन ढोबळे होते, तर डॉ. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
परिषदेची यशस्वी सांगता
परिषदेत सहभागी संशोधकांनी सादर केलेल्या शोधनिबंधांसाठी तांत्रिक सत्र १ व २ आयोजित करण्यात आली होती. या सत्रांमध्ये एकूण ५२ शोधनिबंध सादर करण्यात आले. या सत्रांचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेंद्र शिंदे व प्रा. दिव्या जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिव्या जाधव यांनी केले, तर परिषदेच्या संयोजिका डॉ.मृदुल कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेची यशस्वी सांगता झाली.


