सोलापूर: सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. येथे चारचाकी गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, ११ जण जखमी असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सोलापूरहून सर्वजण देवदर्शनासाठी जात होते.
चिवरी पाटी या गावाच्या जवळ चारचाकी गाडीचे ( क्र. एम. एच. 24 व्ही 4948) पुढचे टायर फुटलं. गाडीचा वेग जास्त होता. त्या वेगात गाडी पलटली झाल्यानंतर तीच्या अनेक पलट्या झाल्या. अपघातामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उळेगाव येथील पुजा हरी शिंदे (वय 30), पुणे येथील हडपसर भागात राहणाऱ्या सोनाली माऊली कदम (वय 23), साक्षी बडे (वय 19 ) या तिघीचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गाडीत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्तींपैकी कांही जणांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
गेली अनेक दिवसांपासून या मार्गावर अपघातांच प्रमाण वाढलं आहे. अनेकदा वाहणांची स्पीड अन्यथा नसेत असलेल्या चालकामुळेही अनेकदा अपघात होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच या मार्गावर एक असाच अपघात झाला होता. त्यामध्येही दोघांना आपला जीव गमवावा लागला होता.


