State Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर महाराष्ट्र सरकारने संघातील राज्यातील खेळाडूंना गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंना विशेष सत्कार सोहळ्यात सन्मानित करून रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या महाराष्ट्रातील तिन्ही खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.
महिला क्रिकेटपटूंचा सन्मान
राज्य सरकारच्या वतीने महिला क्रिकेटपटूंना विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आली.
हेही वाचा – टीम इंडियाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक; भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
पुणे-अहमदनगरमध्ये बिबट्यांचा वाढता धोका
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि अहमदनगर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांत नागरिकांचा जीव गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या या दोन जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या 1,300 पर्यंत पोहोचल्याचे अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने विशेष रेस्क्यू सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला असून, लवकरच मंजुरी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा
बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 21 प्रमुख विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. काही प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कंत्राटदारांना बोलावून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. विलंब झालेल्या कामांबाबत त्यांना तातडीने सुधारात्मक उपाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


