Sanjay Raut On Anjali Damania: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे ‘कॉल डिटेल रेकॉर्ड्स’ (CDR) सार्वजनिक केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “दमानिया या काय ‘रॉ’ एजंट आहेत का?” असा सवाल करत राऊत यांनी ही गुप्त माहिती बाहेर येण्यामागे सरकारमधीलच अदृश्य हातांचा संशय व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांशी वारंवार संवाद झाला आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “अशी गुप्त माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या संमतीशिवाय बाहेर येऊच शकत नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर स्वतःचेच सहकारी आहेत का?” बाह्य शक्तींचा वापर करून आपल्याच लोकांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची पुष्टी राऊत यांनी दिली. “अजित पवार आणि त्यांचे कुटुंब यांच्याशी उद्धव ठाकरेंचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. मात्र, महाविकास आघाडी म्हणून काय निर्णय घ्यायचा, हे काँग्रेसशी चर्चा करूनच ठरवले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका मांडणार आहेत.
‘डिनर डिप्लोमसी’वरून स्पष्टीकरण
दिल्लीतील खासदारांच्या भेटीगाठींवरून सुरू असलेल्या चर्चांना राऊत यांनी ‘साधं जेवण’ म्हणत पूर्णविराम दिला. खासदार नागेश आष्टीकर यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, “दिल्लीत मंत्री आणि खासदारांनी एकमेकांना जेवणाचे निमंत्रण देणे ही सामान्य बाब आहे. याला राजकीय वळण देणे चुकीचे आहे. मंत्री हा संपूर्ण देशाचा असतो, त्यामुळे त्यांच्याकडे जेवायला जाण्यात काहीच वावगे नाही.”


