Kolhapur Crime: कोल्हापूरचे आराध्य दैवत असलेल्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात भाविक आणि पुजारी यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे खळबळ उडाली आहे. परिते गावातील भाविकांना १५ ते २० पुजाऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी आणि डोक्यात नारळ मारून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पुजारी भाविकांवर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसत आहे. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या १५ पुजारी आणि १५ भाविक अशा एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
नेमका वाद कशामुळे? उलटसुलट चर्चांना उधाण
ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी दोन परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. भाविकांनी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केली आणि देवाच्या छबिन्यासोबत छेडछाड केली, असा आरोप पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, परिते ग्रामस्थांनी आणि सरपंच मनोज पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पुजाऱ्यांनीच वादाला सुरुवात करून भाविकांना मारहाण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या घटनेच्या निषेधार्थ परिते गावात भव्य ‘निषेध फेरी’ काढण्यात आली.
पोलीस प्रशासनासमोर आव्हान; भाविकांमध्ये संतापाची लाट
ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच मंदिराच्या पवित्र परिसरात असा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


