Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला परभणीत मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली असून तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्ष नेतृत्वाला मोठा इशारा दिला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
परभणीतील या राजकीय घडामोडींना सुरुवात झाली ती ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विधानांपासून. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू असतानाच पक्षश्रेष्ठींनी परभणीचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची पदावरून हकालपट्टी केली होती.
मात्र या निर्णयाचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. आनेराव यांना पदावरून हटवल्यामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले असून, त्यांनी निषेध म्हणून धडाधड राजीनामे सादर केले आहेत.
माहितीनुसार, शिवसेना भवन येथे आयोजित महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे पक्ष नेतृत्वाने गंगाप्रसाद आनेराव यांच्यावर कारवाई केली होती.
दरम्यान, गंगाप्रसाद आनेराव हे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय जाधव यांच्या संभाव्य नाराजीच्या चर्चांदरम्यान पक्षात डॅमेज कंट्रोल करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र हा निर्णय उलटल्याचे चित्र आता दिसत आहे.
राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या आठ दिवसांत उद्धव ठाकरे यांनी निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही सदस्यत्वाचाही राजीनामा देऊ.
या सामूहिक राजीनाम्यांमुळे ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आता या प्रकरणावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


