जालना : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने मराठा आरक्षणासाठी शासन आदेश (जीआर) जारी केल्यानंतर जरांगे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले होते. मात्र, आता पुन्हा त्यांनी सरकारवर दबाव वाढवला असून, येत्या दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रे तातडीने देण्याची मागणी केली आहे, अन्यथा नारायणगड (बीड) येथील दसरा मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
जरांगेंचा सरकारला थेट इशारा
जालना येथील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी सरकारला उद्देशून सांगितले, “हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात करा. मनुष्यबळ उपलब्ध करा, अन्यथा नाईलाजाने आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. सरकारच्या चुका आम्हाला अडचणीत आणू नयेत. जीआरमध्ये काही त्रुटी असतील, तर त्या सुधाराव्या. येवल्यातील एका नेत्याच्या सांगण्यावरून थोडे इकडे-तिकडे केले, तर लक्षात ठेवा, आम्ही 1994 चा जीआर रद्द करण्यासाठीही न्यायालयात जाऊ.” जरांगे यांनी 17 सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्रे देण्याची मागणी केली, अन्यथा दसरा मेळाव्यात आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर केली जाईल, असे सांगितले.
ओबीसी नेत्यांवर टीका
जरांगे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “लक्ष्मण हाके कोण आहे, मला माहीत नाही. अशा लोकांना मी भाव देत नाही. ओबीसी नेत्यांची तडफड पाहून मराठा समाजाला सांगतो, हुशार राहा. हा जीआर आम्ही गरीबांनी मिळवला आहे, पण यामुळे अर्धा महाराष्ट्र परेशान आहे.” त्यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन करताना ओबीसी नेत्यांच्या विरोधाला भीक न घालण्याचे सांगितले.
दसरा मेळाव्याची तयारी
जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे दसरा मेळावा आयोजित केला आहे. “ज्यांना यायचे आहे, त्यांनी या. आमचा विजय अनेकांना पचलेला नाही. राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री मराठ्यांचा अपमान करणार नाहीत,” असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला चेतावणी दिली की, मराठा समाजावरील गुन्हे मागे घ्यावे लागतील, आणि जर काम होत असेल तर त्यांचे कौतुकही केले जाईल.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केले असले, तरी याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याचा जरांगेंचा आरोप आहे. त्यांनी सांगितले की, जीआरमध्ये काही त्रुटी असतील, तर सरकारने त्या तातडीने दुरुस्त कराव्या. “हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्रे द्या, नाहीतर दसरा मेळाव्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू,” असे जरांगे यांनी ठणकावले. त्यांनी यापूर्वीच्या 1994 च्या जीआरलाही आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.


