मुंबई: राज्यातील भोगवटादार वर्ग-२ म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून, आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे, याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले. सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी ११ मार्च रोजी भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय केवळ एका बँकपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग-२ खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी बँकेला तारण घेता येतील, असा निर्णय घेतला. यापूर्वी १९९० मध्ये याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. आता त्याचे स्मरणपत्र महसूल विभागाने निर्गमित केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही, तर बँक अडचणीत येते. अशावेळी अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग-२ असेल तर त्यावर बोजा चढवता येत नाही, असे बँकांचे म्हणणे होते.
त्यामुळे भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी, बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबत्चे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.


