मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी दसरा मेळाव्यात केलेल्या सनसनाटी दाव्यांवर परब यांनी प्रत्युत्तर देत कदम यांच्या वैयक्तिक आणि राजकीय इतिहासावर टीका केली.
अनिल परब म्हणाले, रामदास कदमांच्या बायकोने स्वतःला जाळले की तिला जाळले? याची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी करत परब यांनी कदम यांच्या १९९३ च्या ज्योती कदम आत्महत्येच्या प्रकरणाला नव्याने उघड केले. तसेच, कदम यांच्या अपराधांची चौकशी करण्यासाठी त्यांचे पुत्र व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना आव्हान दिले.
परब यांनी कदम यांच्या दाव्यांना ‘१०० टक्के खोटे’ ठरवले. “बाळासाहेबांच्या मृत्यूवेळी मी विभाग प्रमुख असल्याने मी साक्षीदार होतो. २४ तास मी तिथे होतो. मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठल्याही बॉडीला इतका कालावधी मिळू शकत नाही. रामदास कदमांना १४-१५ वर्षांनंतर कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केले, मग तक्रार का नाही केली? गेली १२ वर्षे तोंड का बंद होते?” असा सवाल उपस्थित केला.
कदम यांनी दावा केला होता की, बाळासाहेबांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस ठेवण्यात आला होता आणि कोणालाही खोलीत प्रवेश नव्हता. परब यांनी याला ‘नीचपणा’ म्हटले आणि उत्तर देण्याची गरज नसल्याचे सांगितले, पण ‘पोरी बाळी नाचवणाऱ्याला’ उत्तर द्यावे लागते, असे टोमणा मारला.
जमीन लुटी, दादागिरी आणि पुतण्याची आत्महत्या
परब यांनी कदम यांच्या ‘१०० अपराधां’बद्दल बोलताना, “मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवले. का वाचवता? डान्सबार चालवतात, वाळू चोरी, दादागिरी, जमिनी लाटणे, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत,” असे सांगितले. लोकांच्या जमिनी खाल्ल्या, घरे बळकावली, कोणाला बेघर केले. याची यादी असल्याचे त्यांनी म्हटले. विशेषतः, कदम यांच्या पुतण्याने केलेल्या आत्महत्येचे कारण काय, याचा शोध घेण्याची मागणी केली. “योगेश कदमांनी बापाच्या उद्योगांची चौकशी करावी. नार्को टेस्ट शक्य नसेल तर ते तरी करा,” असे आव्हान अनिल परब यांनी दिले.


