Maharashtra Politics : नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव पाटील जवळगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.
एका सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जवळगावकर यांनी काँग्रेसमध्ये राहिल्याबाबत खंत व्यक्त केली. “अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आज आमदार राहिलो असतो,” असे वक्तव्य त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिक उधाण आले आहे.
दरम्यान, आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अंतिम निर्णय कार्यकर्त्यांच्या मतावर अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले असून २६ जून रोजी हदगाव येथे महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जवळगावकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का, की पक्षातच राहणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे नांदेडच्या राजकीय समीकरणांमध्ये सुरू असलेले बदल. उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनीही वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
यापूर्वी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, आता भाजप आणि शिंदे गट दोघेही आपली ताकद वाढवण्यासाठी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
हदगाव मतदारसंघात आगामी काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड घडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात असून सर्वांचे लक्ष २६ जूनच्या बैठकीकडे लागले आहे.


