BJP-Congress Alliance: राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आला आहे. ज्या काँग्रेसला संपवण्याची घोषणा भाजपने केली होती, त्याच काँग्रेसच्या मदतीने भाजपने अंबरनाथमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आपल्याच मित्रपक्षाला (शिवसेना शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने हा धक्कादायक पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
असे जुळले सत्तेचे गणित
अंबरनाथ नगरपरिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, आता भाजपने नवी मोट बांधली आहे:
भाजप: १६ जागा
काँग्रेस: १२ जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ४ जागा
एकूण बळ: ३२ नगरसेवक (बहुमताचा आकडा पार)
भाजपच्या तेजश्री करंजुले या आधीच नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत, आता या नव्या आघाडीमुळे त्यांना सभागृहातही स्पष्ट बहुमत मिळणार आहे. सर्वात जास्त म्हणजेच २३ जागा निवडून आणूनही शिवसेना शिंदे गट सत्तेपासून दूर फेकला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसमुक्त भारताच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेचा घात केला आहे, ही अभद्र युती आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
शिंदे गटाच्या टीकेला भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अंबरनाथमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत जाणे ही खरी ‘अभद्र युती’ ठरली असती. आम्ही युतीसाठी चर्चेचा प्रयत्न केला, पण शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा पलटवार त्यांनी केला.


