Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी दिसून येत आहे. आता या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
वर्धा जिल्ह्यात ई-केवायसीतील त्रुटींमुळे तब्बल ३०,९१८ लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्यात आला आहे. यामध्ये २२,९२१ महिला ग्रामीण भागातील तर ७,९९७ महिला शहरी भागातील आहेत. शासन स्तरावरून संबंधित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लाभ बंद झालेल्या महिलांनी ३१ जानेवारीपर्यंत आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २७ ते ३१ जानेवारीदरम्यान महिलांनी अर्ज, आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणि स्वयंघोषणापत्र अंगणवाडी सेविकांकडे सादर करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याने किंवा प्रक्रिया योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेक महिलांचे अनुदान बंद झाले आहे. लाभार्थ्यांच्या तक्रारीनंतर शासनाने फेर ई-केवायसीचा निर्णय घेतला असून अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पडताळणीत ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये पात्र ठरतील, त्यांचा लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० मासिक लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


