BMC Election 2026 : राज्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने प्रचार चांगलाच शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तर राज्यातील भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट, ठाकरेंचा शिवसेना गट हे पूर्ण ताकदीने उतरले आहेत. उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची एकत्र सभा शिवाजी पार्कवर झाली. या सभेला हजारोंचा जनसागर उपस्थित होता. आज मुंबईवर संकट आलं आहे, त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत, असे राज ठाकरे म्हणाले. सोबतच त्यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
बाळासाहेब, माझे वडील आणि माँ इथे असायला हवे होते
मी लहान असताना शिवसेनेची स्थापनाच इथे झाली. तेव्हा आजोबा प्रबोधनकार ठाकरे माझे वडील श्रीकांत ठाकरे माँ ही उपस्थित होती. या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्ही आज माझे आजोबा, बाळासाहेब, माझे वडील आणि माँ इथे हजर असायला पाहिजे होत्या. मुंबईसाठी आम्ही दोन भावांनी उभारलेला हा लढा इथे नसले तरी ते वरून पाहत असतील, अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगीरी
२० वर्षानंतर मी पहिल्यांदा युती करतोय. त्यामुळे युतीच्या अख्ख्या प्रक्रियेत अनेक लोकांना तिकीट दिली गेली नाही. अनेकजण नाराज झाले. काहींना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं. आमच्याही हातात काही गोष्टी नसतात. त्यांना दुखावणं आमचा हेतू नव्हता. मने दुखावलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत राज ठाकरेंनी तिकीटवाटपात नाराज झालेल्यांची दिलगिरी व्यक्त केली. गेले ते परत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अदाणींचे वाढते साम्राज्य
भाजपच्या सत्तेत अनेक उद्योग राज्यातून गुजरातला गेले. आशियातले सगळ्यात मोठे उद्योगपती हे गुजरातचे गौतम अदानी झाले. त्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा आक्रमक होत लावरे तो व्हिडीओतून अदानीचे वाढते साम्राज्य दाखवले. राज्यासह देशातला काहीच भाग सोडला तर संपूर्ण देशात अदानींनी त्यांचा उद्योग पोहोचवला आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र येऊन मुंबई महापालिका भाजपच्या हातात जावू देऊ नये, असे म्हटले.


