मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेच्या ‘मलिदा’साठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत असल्याचा खोचक आरोप राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. “दोन्ही टोकाच्या बाजूचे लोक फक्त पालिकेतील सत्तेसाठी एकत्र आले आहेत. ‘आम्ही दोघे भाऊ मिळून मुंबई पालिकेतील मलिदा खाऊ’ अशी भावना त्यांची आहे,” असा टोला देसाई यांनी लगावला.
तसेच, विकासाच्या व्हिजन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचाच महापौर BMCमध्ये बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंच्या नमो पर्यटन टीकेला देसाईंचे प्रत्युत्तर
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या ‘नमो पर्यटन केंद्र’ योजनेवर टीका करताना गडकिल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांव्यतिरिक्त इतर कोणाचेही नाव असू नये, अन्यथा तोडफोड केली जाईल असा इशारा दिला होता. या टीकेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “राज ठाकरे यांनी ही संकल्पना समजून घ्यायला हवी होती.
आम्ही गडकिल्ल्यांवर नाही, तर किल्ल्यांच्या पायथ्याला नमो पर्यटन केंद्र उभे करणार आहोत.” राज ठाकरेंची टीका अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे सांगताना देसाईंनी पुढे म्हटले, “एक वर्षापूर्वी ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंनी आज त्यांच्याच नावाने सुरू होणाऱ्या योजनेवर टीका करणे म्हणजे फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे.”
तोडफोडचा प्रयत्न झाल्यास सरकार गप्प बसणार नाही
राज ठाकरेंच्या तोडफोड इशाऱ्याला थेट उत्तर देताना देसाई म्हणाले, “शासकीय कोणतेही उभे राहिलेले काम तोडफोड करण्याचा कोणत्याही घटकाने प्रयत्न केला, तर शासन हात बांधून गप्प बसणार नाही.” हा इशारा राज ठाकरेंचे नाव न घेता दिला गेला असला, तरी स्पष्ट संदेश देणारा ठरला आहे.
हे प्रकरण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरत असून, ठाकरे बंधूंमधील संभाव्य एकी आणि मनसे-शिवसेना (उद्धव गट) यांच्यातील जवळीक याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, महायुतीकडून BMCवर पुन्हा दावा ठोकला जात असून, ठाकरे गट आणि मनसे यांना ‘सत्तेची भूक’ असल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली जात आहे.


