Asaduddin Owaisi : कोल्हापूर शहरात सोमवारी (२९ सप्टेंबर) एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी एमआयएमने महाराष्ट्रातील मोहिमेचा श्रीगणेशा केला असून, ओवेसींनी कोल्हापूर, इचलकरंजी आणि कुरुंदवाडसह आजरा भागात पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध केला होता, तरीही ओवेसींनी सभेत भाजप, मोदी आणि राज्यातील नेत्यांवर सडकून टीका करत मुसलमानांना एकत्र येण्याचा आणि ‘पुरोगामी’ पक्षांना जाबदार करण्याचा संदेश दिला. सभेत उपस्थित लाखो मुसलमान श्रोत्यांनी जोरदार घोषणांनी प्रतिसाद दिला.
मुसलमानांसाठी एकत्र होण्याची वेळ
ओवेसी म्हणाले, “आता मुसलमानांनी सतर्क होण्याची वेळ आली आहे. तुम्ही तुमची राजकीय नेतृत्व तयार करा आणि एकत्र व्हा. इम्तियाज जलील यांचे नेतृत्व टिकू नये म्हणून शिंदे, शरद पवार, अजित पवार, फडणवीस, ठाकरे – सगळे एकत्र आले आहेत. जर तुम्ही सो-कॉल्ड पुरोगामी पक्षांना मतदान करता, तर त्यांना जाब विचारता येत नाही. मनोज जरांगे-पाटील फक्त तीन दिवस उपोषणाला बसले, आणि सरकार त्यांच्या पायाशी आले. मुसलमानांनीही असेच एकत्र यावे!”
त्यांनी मुसलमान तरुणांना सल्ला दिला, “विरोधक तुम्हाला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न करतील. शहाणे व्हा, या जाळ्यात पडू नका. मोहम्मद पैगंबरांचे ‘आय लव्ह मुहम्मद’ पोस्टर रस्त्यावर टाकू नका, ते छातीशी कवटाळून ठेवा. ते फक्त नाव नाही, तर विचार आहेत. खरा मुसलमान असाल, तर व्यसनांपासून दूर राहा.”
उत्तर प्रदेशातील घटनांचा उल्लेख करत, “बरेलीमध्ये काही घडले तर मुख्यमंत्री भरभरून बोलले, पण फतेहपूर दर्ग्यावर हल्ला झाला तर मौन. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. मोदी, अमित शाह, शिंदे, फडणवीस यांना घाबरू नका, फक्त अल्लाहला घाबरा. ही हुकूमत मुसलमान-विरोधी आहे. मशीद आणि दर्ग्यांपासून आम्हाला लांब करू इच्छिता, पण हा गैरसमज आहे. आम्ही त्यासाठी जगू आणि मरू. सगळ्यांना जीव आहे, आणि वेळ आली तर उत्तर देऊ.”
तुमच्या बापाशी भांडणारा माणूस आहे
हिंदुत्ववादी संघटनांनी दौऱ्याला विरोध करत ‘पाय ठेवू देणार नाही’ असा इशारा दिला होता, पण ओवेसींनी त्यावरून हल्लाबोल केला. आज मला कोल्हापूरमध्ये येऊ देण्यास विरोध झाला. मी त्यांना सांगतो, तुम्ही अजून बच्चे आहात, तुमचे दूधाचे दात अजून पडले नाहीत. तुमच्या बापाशी भांडणारा माणूस आहे. इथे आल्यानंतर पोलिसांनी ‘लव्ह लेटर’ दिले, प्रक्षोभक भाषण करू नका. आम्ही प्रक्षोभक बोलत नाही, पण राज्यातील सत्ताधारी नेते रोज महाराष्ट्रात प्रक्षोभक बोलतात, त्यांच्यावर काय कारवाई करता?
ओवेसींनी कोल्हापूरला ‘छत्रपती शाहू महाराजांची भूमी’ म्हणून अभिवादन करत, स्थानिक निवडणुकांसाठी एमआयएमला मतदान करण्याचे आवाहन केले. “आगामी निवडणुकांत कोल्हापूरमधील जनतेने एमआयएमला भरभरून मत द्या. भाजप आणि मोदींना हरवा, देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून घालवा!”
आशिया कप खेळला नसतो तर आभाळ कोसळ असतं का?
२०२५ इंडो-पाक पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर उल्लेख करत ओवेसींनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली. “पहलगाममध्ये भारतीयांना धर्म विचारून मारले गेले. ऑपरेशन सिंदूरने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी दहशतवाद्यांचे लपोवाडे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचे ८० टक्के पाणी बंद, त्यांची विमाने आमच्या हवाई हद्दीत येत नाहीत, व्यापार बंद तरी आशिया कपमध्ये क्रिकेट का खेळलं?
मोदी म्हणाले होते ‘खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही’, ते काय झालं? आशिया कप खेळला नसतो तर आभाळ कोसळणार होतं का? पहलगाम शहीदांच्या जीवाची किंमत काय? भाजप-आरएसएसने उत्तर द्यावे. हे सैनिकांचे शौर्य आहे, क्रिकेटरांशी तुलना करू नका. राष्ट्रीयत्वाच्या बाता करणाऱ्यांनो, तुमचा स्वाभिमान मेला आहे. मोदीजी, किती दिवस देशप्रेमाचे नाटक करणार?”


