वर्धा: लग्न (Marriage) हा केवळ दोन व्यक्तींच्या एकत्र येण्याचा सोहळा नसतो, तर दोन कुटुंब आणि अनेक नातेवाईकांना जोडणारा बंध असतो. त्यामुळेच, लग्नकार्यात नातलगांसह मित्र-परिवार आणि दोन नवख्या कुटुंबाचं नात दृढ करणारा धागा मानला जातो. मात्र, अनेकदा लग्नसोहळ्यात किरकोळ कारणावरुन भांडणं होतं असतात, कधी नवऱ्या मुलाकडील तर कधी नवरी मुलीकडील लोकांकडूनही भांडणं होतात. अनेकदा हा किरकोळ वाद गंभीर गुन्ह्यापर्यंत येऊन पोहोचतो. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्यात देखील अशीच धक्कादायक घटना घडली असून लग्न वरातीत पुतण्याकडून झालेल्या चाकू हल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं लग्नात मोठं विघ्न आलं असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लग्नसोहळ्याचा आनंद मांडवात होता, सगेसोयरे आनंदाने मुहूर्ताची वाट बघत होते, तयारी जोरदार सुरू होती. नवरदेवाची घोड्यावरून वरातही निघाली होती. बँड बाजा वाजत गाजत वरातीत नाचगाणे देखील सुरू होते. दरम्यान, या वरातीत किरकोळ कारणावरुन वाद झाला आणि सर्वाना हादरवून सोडणारी घटना घडली. हनुमान मंदिरातून वरात निघताच अल्पवयीन पुतण्याने वरातीत आपल्या काका आणि चुलत भावावर चाकू हल्ला केला. त्यात काका प्रभाकर भलमे आणि आरोपीचा चुलत भाऊ रितेश भलमे याचा मृत्यू झाला आहे. संपत्तीच्या वादातून हा चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे, याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतले आहे.
वर्ध्याच्या नजीक असलेल्या बरबडी येथे भलमे परिवारात काही दिवसापासून संपत्तीचा वाद सुरू होता. आठ महिन्यापूर्वी देखील अल्पवयीन आरोपी आणि मृतकांमध्ये याच कारणातून भांडण झाले असल्याची माहिती आहे. त्यात दोन्ही बाजुने गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, दोघांना मारण्याचा कट अल्पवयीन आरोपीकडून आखला जात होता, त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू देखील मागविल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच, घरातील लग्नसोहळ्यात रात्री सर्वाना अचंबित करणारी घटना घडली. अल्पवयीन आरोपी नातेवाईकाच्या लग्नात आला, त्याने संधी साधून वरात सेवाग्राम मार्गावर हनुमान मंदिराजवळ पोहचताच काका आणि चुलत भावावर चाकूने सपासप वार केले. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच येथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.


